जेजुरीच्या उत्तर दिशेस १८ किमी अंतरावर माळशिरस गावानजिक सह्याद्रीच्या डोंगरमाथ्यावर पुरातन प्राचीन भुलेश्वर शिवालय आहे. पांडवांनी हे मंदिर बांधल्याची अख्यायिका जरी असली तरी १२ व्या शतकातील यादव कालीन राजा रामदेव राय यांनी हे मंदिर बांधल्याचे सांगितले जाते. शिवकालीन शतकात मुरार जोगदेव यांनी येथे काही काम केल्याचे उल्लेख आढळतात. मात्र मंदिरापुढील सभामंडप व नगारखाना १७ व्या शतकात पेशव्यांनी बांधल्याचे इतिहास तज्ञांचे मत आहे. सोमवार, श्रावण महिना व महाशिवरात्रीला येथे शिवभक्तांची मोठी गर्दी असते. पुरंदरच्या भुमीला ऐतिहासिक महत्त्व आहे. कऱ्हाकाठच्या मातीला ५२ सरदारांचा इतिहास सांगितला जातो. शिवप्रभुंच्या स्वराज्याची पहिली लढाई पुरंदर मधील खळद ते बेलसर या भुमीत झाली यावेळी स्वराज्याचे पहिले सरसेनापती बाजी पासलकर, सरदार शिवाजीराव इंगळे, गोदाजीराजे जगताप हे कामी आले. बाजी पासलकर व गोदाजीराजे जगताप यांचे समाधीस्थळ सासवड येथे तर शिवाजीराव इंगळे यांचे समाधी स्थळ कऱ्हाकाठी वाळुंज या गावी आहे.